*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदगीर येथील विविध इमारती, विकास कामांचे लोकार्पण* * सुसज्ज इमारतींमुळे उदगीर नगरीच्या वैभवात भर * अटल अमृत उदगीर शहर पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण * उदगीर भूमिगत गटार योजनेच्या कामाचे भूमिपूजन उदगीर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज उदगीर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील सुसज्ज प्रशासकीय इमारती, अटल अमृत उदगीर शहर पाणी पुरवठा योजना, कौळखेड व गुडसूर येथील वीज उपकेंद्रांचा यामध्ये समावेश आहे. तसेच उदगीर शहरातील भूमिगत गटार योजनेचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल खान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बी. एस. पांढरे, अधिक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. *तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालय* उदगीर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 2 हजार 876 चौरस मीटर आहे. यामध्ये तळ मजल्यावर वाहनतळ (पार्किंग), पहिल्या मजल्यावर तहसीलदार यांचा कक्ष, कॉन्फरन्स हॉल, कोर्ट रूम यासह विविध कक्ष, दुसऱ्या मजल्यावर अभिलेख कक्ष, ईव्हीएम स्ट्राँग रूम, बैठक सभागृह आणि इतर कक्ष आहेत. तिसऱ्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालय असून उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षासह विविध कक्ष, कोर्ट रूम, कॉन्फरन्स हॉल आहे. या इमारतीसाठी सुमारे 10 कोटी 19 लाख रुपये खर्च झाला आहे. *पंचायत समिती इमारत* उदगीर पंचायत समितीच्या नूतन इमारतीमध्ये एकूण चार मजले आहेत. एकूण जवळपास 3 हजार 112 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या इमारतीची उभारणी सुमारे 20 कोटी 17 लक्ष रुपये निधीतून करण्यात आली आहे. गट विकास अधिकारी यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी यांचे सुसज्ज कक्ष, बैठक सभागृह या इमारतीमध्ये तयार करण्यात आले आहेत. *उदगीर प्रशासकीय इमारत* उदगीर येथे सुमारे 14 कोटी 95 लाख रुपये निधीतून तीन मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ सुमारे 5 हजार 532 चौरस मीटर असून तळ मजल्यावर वाहन तळ आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, सहाय्यक दुय्यम निबंधक, कृषि विभागासह विविध शासकीय विभागांची कार्यालये या तीन मजली प्रशासकीय इमारतीमध्ये असतील. *उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन इमारत* उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि उदगीर पोलीस स्टेशनसाठी सुमारे 32 कोटी 54 लक्ष निधीतून दोन मजली इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ जवळपास 10 हजार 957 चौरस मीटर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या इमारतीमध्ये तळमजला व पहिल्या मजल्यावर उदगीर शहर पोलीस स्टेशन आहे. तर दुसऱ्या मजल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे. ही इमारत भूकंप रोधक असून सोलार, अग्निशमन यंत्रणा, अत्याधुनिक कारागृह, बैठक कक्ष, ठाणे अंमलदार कक्ष आदी सुविधांनी सज्ज आहे. *गुडसुर आणि कौळखेड वीज उपकेंद्राचे लोकार्पण* गुडसुर आणि कौळखेड येथे उभारण्यात आलेल्या 33/11 केव्ही वीज उपकेंद्रांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण केले. गुडसुर येथील उपकेंद्रामुळे गुडसुर, डाऊळ, हिप्परगा, डोंगरशेळकी, कल्लुर व इस्मालपुर येथील ग्राहकांना सुरळीत आणि योग्य दाबाने विद्युत पुरवठा करणे शक्य झाले आहे. तसेच कौळखेड येथील उपकेंद्रामुळे जानापुर, शिरोळ, कौळखेड, मल्लापुर, गुर्धाळ, कुमदाळ व जवळपासच्या वाड्या-तांडे यांना उच्च दाबाने वीज पुरवठा होत आहे. *अटल अमृत उदगीर शहर पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण* उदगीर शहरासाठी पुढील 30 वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून अटल अमृत उदगीर शहर पाणी पुरवठा योजनेच्या 106 कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली. या योजनेसाठी नांदेड जिल्हातील उर्ध्व मण्यार प्रकल्पातील पाणी आरक्षित करण्यात आले. तसेच याठिकाणी उद्भव विहीर घेवून उदगीर शहरासाठी पाणी आणण्यात आले. या योजनेतून शहरात सुमारे 14 हजार नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच बनशेळकी तलाव व हकनकवाडी जलशुध्दीकरण केंद्र येथे 500 के. व्ही. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या योजनेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. *उदगीर शहर भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन* महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत उदगीर शहर भूमिगत गटार योजनेच्या एकूण सुमारे 349 कोटी 88 लाख रूपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार उदगीर शहर भूमिगत गटार योजनेच्या टप्पा-1 साठी 161 कोटी 4 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.
Popular posts
शंकर माध्यमिक आश्रम शाळेतील प्रभारी मुख्याधिपीका सात हजार रुपयाची लाच घेताना अडकली जाळ्यात उदगीर - बोरताळा पाटी, देगलुर रोड, उदगीर येथील शंकर माध्यमिक आश्रम शाळेतील प्रभारी मुख्याधिपीका यांना सात हजार रुपयाची लाच घेताना लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसाकडुन मिळालेली माहीती आशी की, तक्रारदार यांनी काही खाजगी अडचणीमुळे ईयत्ता ९ वी मध्ये शिक्षण अर्धवट सोडले होते. त्यानंतर तक्रारदार याना पुढील नौकरीसाठी व व्यवसायासाठी १० वी व त्यापुढील शिक्षण घेणे गरजेचे असल्याने, ता. ६ ऑगस्ट रोजी शंकर माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका त्रिविणी शेरे यांना भेटले. त्यावेळी मुख्याध्यापिका शेरे त्रिविणी यांनी १० वी वर्गात प्रवेश देण्यासाठी दहा हजार रूपयाची लाचेची मागणी केलेबाबत तक्रारदार यांची लाचलुचपत प्रतिबंधक लेखी तक्रार दिली. यावरुन सापळा रचुन आरोपी श्रीमती त्रिवेनि बबुराव शेरे, (वय ४१) प्रभारी मुख्याधापिका शंकर माध्यमीक अश्रमशाळा बोरताळा पाटी, देगलुर रोड उदगीर यांनी तक्रारदार यांचेकडून सात हजार रुपये लाचेची रक्कम त्यांचे कार्यालयामध्ये पंच साक्षीदारा समक्ष स्वतः स्वीकारली असता त्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधीत अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपअधिक्षक संतोष बर्गे पोलिस निरीक्षक जगदीश राऊत, पोलीस कॉस्टेबल किरण गंभीरे, मंगेश कोंडरे, हवलदार श्री.अलुरे, महिला पोलीस कर्मचारी पठाण यांच्या पथकाने सापळा रचुन कार्यवाही करण्यात आली आहे. या घटने वरून एक लक्षात येते की आता शिक्षण विभाग ही लाच घेण्यात मागे नाही
स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही, गुत्तेदारांनी वीज ग्राहकांना विनाकारण त्रास देऊ नये - स्वप्निल जाधव उदगीर = सध्या लातूर जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू झाली आहे. वास्तविक पाहता वीज कायदा 2003 च्या कलम 55 प्रमाणे स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही. असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ प्रदेशाचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी सर्व वीज ग्राहकांना कळविले आहे. याची नोंद वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही आवाहन युवा नेते स्वप्निल जाधव यांनी केले आहे. वीज मीटर बदलण्यासाठी येणारे ठेकेदार आहेत. ती एक नोडल एजन्सी आहे. या नोडल एजन्सीला आपण वीज मीटर लावू नका, असे स्पष्ट सांगावे असेही विधीज्ञ दर्यापूरकर यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात कोणत्याही कायद्यानुसार सरकारी कामात अडचण आणणे ही केस आपल्यावर या बाबतीत लागू होऊ शकत नाही. स्मार्ट मीटर लावायला आलेल्या लोकांना हे मीटर लावणे आवश्यक असल्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या आदेशाची, परिपत्रकाची प्रत मागावी. जी ते तुम्हाला देऊ शकत नाहीत. असेही वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे. हे मीटर लावणे सर्वांनी ताबडतोब बंद करावे. कारण या मीटरच्या वेगवान फिरल्याने विज बिल भरता भरता आपल्याला अतोनात त्रास होणार आहे. एकदा का जर हे मीटर आपण लावले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही. याची सर्वांनी जाणीव ठेवावी, असेही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने म्हटल्याचे स्वप्निल जाधव यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना स्वप्निल जाधव यांनी मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालाचाही हवाला दिला आहे. मध्यप्रदेश हायकोर्टने वीज ग्राहकांना स्पष्ट केले आहे की स्मार्ट मीटर लावणे हे अनिवार्य नाही. थाई स्वरूपातील मिटर घेत असतील तर त्यांच्यासाठी ते अनिवार्य आहे मात्र नियमित ग्राहकांसाठी ते अनिवार्य नाही. संदर्भात विधिज्ञ शरद जोशी यांच्या म्हणण्यानुसार वीज ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवणे हे कायद्याने अपराध ठरू शकेल जबरदस्ती करून मीटर जर कोणी बसवत असेल तर तो उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरेल अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण न्यायालयीन कारवाई बद्दल सीहोर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत वर्मा यांनी आभार मानले आहेत, स्मार्ट मीटर बसवणे हे खाजगी कंपनीने कंत्राट घेऊन शासनाच्या काही लोकांना हाताशी धरून हे काम चालू केले आहे. भविष्यात हे मीटर रिचार्ज सिस्टीम चे होणार आहेत. त्यामुळे राज्यात त्याचा विरोध सुरू असताना तुमच्या घरी येऊन जबरदस्तीने मीटर बसवण्याचे काम वीज वितरण कंपनी करत असेल तर त्यांना ताबडतोब विरोध करावा. जीनियस या कंपनीचे मीटर ज्यांच्या घरी बसवले आहे, त्यांना आता दुप्पट बिल येऊ लागले आहेत. याकडे महाराष्ट्र विज ग्राहक संघटनेने लक्ष वेधले आहे. भविष्यात आपली लुबडणूक होणार नाही यासाठी जनतेने स्मार्ट मीटरला तीव्र विरोध करावा या संदर्भामध्ये काही स्वयंसेवी संस्था स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना तयार करत आहेत तशा पद्धतीचा अर्ज ग्राहकाने महावितरणला देऊन त्याची पोचपावती घ्यावी त्यासाठी सर्वांनी सावध राहावे असेही आवाहन जाधव यांनी केले आहे.
Image
उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे:- श्री बस्वराज पाटील नागराळकर अध्यक्ष महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी उदगीर उदगीर:- उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे असून आज ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्या व्यापाऱ्याच्या सहयोगामुळे असून उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असल्याचे महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर यांनी अडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उत्तर देताना म्हणाले अडत वेलफेअर असोसिएशन वतीने आज रोजी अडत मार्केट मध्ये महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता,यात सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर,उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे,सचिव डॉ रामप्रसाद लखोटिया,सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवाजीराव हुडे,अजय दंडवते,आडेप्पा अंजुरे,शिवराज वल्लापुरे ,भाग्यश्री चाकुरकर,बस्वराज पाटील,नाथराव बंडे ,प्रशांत पेन्सलवार,अरविंद पाटील, दिलीप चौधरी,रमाकांत अंकुलगे,भिमाशंकर मुद्दा,मल्लिकार्जुन मानकरी, रामचंद तिरूके,डॉ. श्रीकांत मध्वरे , मन्मथ बिरादार यांचा सत्कार आयोजित केला होता,या वेळेस सत्काराला उत्तर देताना श्री बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले की महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी ही संस्था व्यापाऱ्यांनी,शेतकारयानी आपल्या कस्टाटुन उभी केली असुन,उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असून व्यापाऱ्याच्या योगदानामुळे उदगीर चा विकास झाला ,आमचे ध्येय एकच आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे स्वप्न आहे असेही ते म्हणाले,आज आम्ही जे आहोत ते व्यापाऱ्यामुळे या वेळेस अडत वेलफेअर असोसिएशन वतीने उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल बस्वराज पाटील नागराळकर,शिवाजीराव हूडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जगदीश बाहेती,रवींद्र कोरे अडत वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार,नागेश आंबेगाव,साईनाथ कोरे,उमाकांत पांढरे,मल्लिकार्जुन काळगापूरे, श्याम बिरादार, मनोहर बिरादार,शिवाजी पेठे, शिवशंकर बिरादार,मधुकर पाटील, पी. पी.पाटील,साईनाथ कल्याणे,प्रमोद पाटील, कमलाकर भंडे, शांतवीर मुळे,मारुती कडेवार,दिलीप पाटील,दिगंबर गोटमुकले, सुरेश लांडगे,गौतम पिंपरे,विश्वनाथ यलवंतगे, भरत दंडीमे,अरविंद जिरगे,गंगाधर बिरादार,लक्ष्मणराव मोमले, राम बिरादार, संकेत बिरादार,कोंडीराम काळोजी,भिमाशंकर गठोडे सह अडत व्यापारी,सर्व गुमस्था,हमाल उपस्थित होते
Image
उदगीर नगर पालिका अधिकाऱ्याचा उंटावर बसून शेळ्या राखण्याचा प्रकार ? 👉 गेलेले मुख्याधिकारीच चांगले म्हणण्याची नौबत उदगीरकरावर 👉 मुख्याधिकाऱ्यांना भेटणे म्हणजे नशिबच,जेव्हा जावा तेव्हा साहेब बाहेर ,फोन ही घेत नाहीत 👉 आवक जावक विभाग प्रमुख तर स्वतःला राजा महाराजा समजतो? उदगीर:- स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने मागील अनेक वर्षांपासून उदगीर नगर पालिकेवर अधिकारी राज्य असून या अधिकाऱ्यांना शासनाने जनतेचे सेवक म्हणून ठेवले असताना हे अधिकारी उन्मत्त होऊन स्वतःला राजा महाराजा सारखे वागत असल्याचे चित्र सध्या उदगीर नगरपालिकेत पहावयास येत असल्याने सामान्य जनता त्रस्त दिसत आहे,मदमस्त कर्मचाऱ्याची तक्रार मुख्याधिकारी यांच्या कडे करावे म्हटले तर मुख्याधिकारी कोठे राहतात हे त्यांनाच माहिती,जेव्हा केंव्हा जावा मुख्याधिकारी कार्यालयात भेटत नाहीत, जाणाऱ्यांना गेलेलाच अधिकारी चांगला होता म्हणण्याची वेळ आली असून ,येथील आवक जावक ला जो कर्मचारी ठेवला आहे तो इतका उर्मट बोलतो की तो राजा महाराजा लाही मागे टाकत असून प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन जनतेच्या हितासाठी त्वरित अधिकारी बदलावेत अशी मागणी जनता करत आहे
*अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन* उदगीर : जिल्ह्यातील अवैध सावकरीविरुद्ध प्राप्त तक्रारींवर सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत कार्यवाही केली जात आहे. वर्षभरात जिल्ह्यातील तालुकास्तरीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे ५५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत तातडीने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. अवैध सावकारीविरुद्ध कोणत्याही नागरिकाची तक्रार असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरावर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे किंवा जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर या कार्यालयाकडे तक्रार सादर करावी. तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था एस.व्ही. बदनाळे यांनी कळविले आहे